जळगाव (प्रतिनिधी) : मुस्लिम कब्रस्थानजवळ चौघा संशयित तरुणांना ‘गांजा का पित आहेत ?’ याचा जाब विचारल्याने त्यांनी एका ४५ वर्षीय प्रौढाला लाठ्याकाठ्यांनी मारहाण करून दोरीने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक उलगडा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी दि. ७ सप्टेंबर रोजी केला आहे. चौघांना अटक करण्यात आली असून १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबतची माहिती डॉ. रेड्डी यांनी दिली.
अडावद गावालगत असलेल्या हजरत पिरपाकरशा बाबाच्या दर्ग्यासमोर दि.३१ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वा.चे सुमारास एक इसम मयत स्थितित पडलेला आहे. अशी माहिती अडावद गावाचे सरपंच बबन तडवी यांनी अडावद पोलीस स्टेशन येथे फोन करुन दिली होती. मयत इसम हा जगदिश फिरंग्या सोलंकी (वय ४५, रा. पाटचारी,अडावद ता. चोपडा) येथील असल्याची माहिती मिळाली. मयताच्या अंगावर ठिकठिकाणी मारहाण झाल्याच्या व्रण दिसत होते. तसेच कशाचे तरी सहाय्याने गळा आवळल्याचे व्रण दिसत होते.
मयताचा मुलगा ईश्वर जगदिश सोलंकी (वय २० रा. पाटचारी, अडावद) याच्या फिर्यादवरुन अज्ञात आरोपीविरुध्द अडावद पो.स्टे. येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि प्रमोद वाघ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि वाघमारे व पोलीस पथक आरोपीचा शोध घेत होते. तेव्हा चौघा संशयित आरोपींची माहिती मिळाली. मयत जगदीश यांना शेवटचे कोणासोबत पाहिले, त्यांचे लोकेशन याबाबत अभ्यास केल्यावर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांनतर घटनेचा उलगडा झाला. पाटचारी जवळील कब्रस्थान समोर बसुन गांजा पिणारे इरफान अब्दुल तडवी, शहारुख इस्माईल तडवी, शेख मोईन शेख मजिद, कलिंदर रशिद तडवी (सर्वांचे वय २० ते २५, रा. अडावद) यांनी सदर मयतास ठार मारल्याची माहिती मिळाली.
मयत जगदीश सोलंकी यांनी मुस्लिम कब्रस्थानाजवळ गांजा पित असलेल्या चौघांना हटकले. “तुम्ही गांजा पिणारे गंजोटी येथे का बसले आहेत” असे जगदीश सोलंकी बोलले. त्याचा संशयित आरोपी यांना राग आल्याने त्यांनी जगदीश सोलंकी याच्या मोटार सायकलला लाथ मारुन खाली पाडले. तेव्हा जगदीश हा पळु लागल्याने त्यास कब्रस्थान मधिल बांधकाम केलेल्या व्हरांडयात व रुममध्ये संशयित घेवुन गेले. तेथे लाठ्या काठयाने मारहाण केली. तसेच संशयित आरोपी कलिंदर रशिद तडवी याने दोरीने गळा आवळुन ठार मारले. प्रेत उचलुन हजरत पिरपाकरशा बाबाच्या दर्ग्यासमोर आणुन टाकले होते. अशी माहिती संशयीत आरोपींकडून पोलिसांना मिळाली.
संशयित आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची दि.१० सप्टेंबर रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड दिली असुन सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रमोद वाघ व अडावद पोलीस करित आहेत. अडावद पोलिसांनी खून प्रकरणाचा उलगडा अत्यंत मेहनतीने केला असे सांगून पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी तपास पथकाला बक्षीस देऊन गौरविले.