जळगाव, (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा हैदराबाद मुक्ती संग्रामावर आधारित आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अलौकिक कार्यकर्तृत्वाची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ या ऐतिहासिक पुस्तकाचे जळगावात दिमाखात विमोचन करण्यात आले. जळगावचे माजी खासदार तथा गोदावरी समूहाचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील आणि भाजपच्या युवा नेत्या डॉ. केतकी पाटील यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

इतिहास अभ्यासक आणि लेखक भारत वाळके यांनी तब्बल १५ वर्षांच्या प्रदीर्घ अभ्यासानंतर या ऐतिहासिक पुस्तकाचे लेखन केले आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर विविध संस्थाने खालसा करून सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या कणखर नेतृत्वाची चुणूक दाखवली होती. स्वतंत्र इस्लामिक राष्ट्र किंवा मध्य पाकिस्तानाचे स्वप्न पाहणाऱ्या हैदराबादच्या निजामाला त्यांनी स्वतंत्र भारतात विलीन होण्यास कसे भाग पाडले, याची रंजक आणि माहितीपूर्ण मांडणी या पुस्तकात करण्यात आली आहे.

मराठी, तेलगू आणि कन्नड अशा तीन भाषिक प्रांतांचे अस्तित्व असलेल्या तत्कालीन हैदराबाद स्टेटची भौगोलिक व राजकीय परिस्थिती, रझाकार संघटनेने हिंदू रयतेवर केलेले अनन्वित अत्याचार, सक्तीचे धर्मांतरण आणि निजाम सरकारचे जुलमी कायदे याविरुद्ध जनतेने पुकारलेला प्रखर लढा लेखकाने अतिशय प्रभावीपणे यात रेखाटला आहे.

याच लढ्यातून पुढे भाषिक रचनेनुसार मराठी भाषिक मराठवाडा भाग महाराष्ट्रात कसा समाविष्ट झाला, यावरही यात प्रकाश टाकण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांनीही या पुस्तकात एक महत्त्वपूर्ण संदेश देऊन समाजातील इतिहास जागृतीबद्दल कळकळ व्यक्त केली आहे.
या प्रसंगी बोलताना युवा नेत्या डॉ. केतकी पाटील म्हणाल्या, ”आपल्या देशाचा खरा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणे आणि त्यातून त्यांनी प्रेरणा घेणे गरजेचे आहे. देशाच्या इतिहासाचा स्वाभिमान बाळगण्यासाठी प्रत्येक राष्ट्रभक्ताने हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे.”
या सोहळ्याला राकेश वाघ, संकेत शंकपाल, गौरी जोशी, मनीषा खरात, अक्षता शंभरकर, पूजा गांजरे, प्राजक्ता बिडकर, नूतन भाले आदी मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








