जळगाव | दि.२२ जुलै २०२४ | जिल्ह्यातील प्रमुख उत्पन्न असलेल्या केळी पिकाला फळाचा दर्जा मिळावा. यासंदर्भात खासदार स्मिताताई वाघ यांनी संसदेत नियम ३७७ द्वारे मागणी केली. जिल्ह्यातील तसेच राज्यातील प्रमुख नगदी पीक म्हणून केळी पिकाला बघितले जाते ह्या पिकाला फळाचा दर्जा नसल्यामुळे उत्पादक शेतकरी वर्गाला निर्यात, शासकीय सवलती, पीक विमा तसेच बाजार भावात मोठ्याप्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत होते.
त्यामुळे केळी पिकाला फळाचा दर्जा मिळावा ही मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात आली होती. ही मागणी गेल्या बऱ्याच दिवसापासून शासनाकडे प्रलंबित असल्याचे खासदार स्मिताताई वाघ यांनी शासनाच्या लक्षात आणून दिले. केळीला फळाचा दर्जा मिळाल्यानंतर केळी उत्पादक शेतकरीवर्गाचे आर्थिक नुकसान कमी होणार आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात यांवा अशी मागणी खासदार वाघ यांनी केली आहे.
दरम्यान संसदेत जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण कृषी प्रश्नाला वाचा फोडल्याने खासदार स्मिताताई वाघ यांचे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त होत आहे.