जळगाव, दि. १४ – शहरात अमृत आणि भुयारी गटारी योजनेची कामे झाल्यामुळे जळगाव शहराच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या अडीच वर्षांपासून महाविकास आघाडी सरकार च्या काळात जळगाव शहरात विकास कामांना अडथळा निर्माण झाला असून शहरात विविध विकास कामे ठप्प झाली असल्याचा आरोप भाजपकडून होतोयं.
दरम्यान शहराच्या विकासाच्या दृष्टीने आ.सुरेश भोळे यांनी रस्त्यांच्या कामांकरिता नुकतेच पाच कोटी रुपये निधी मंजूर केला. त्याचबरोबर शहरातील विविध विकासकामे व रस्त्यांची कामे करणेसाठी आ.सुरेश भोळे यांनी बुधवारी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अंतर्गत १०० कोटी निधी मिळावा या मागणीचे पत्र दिले.
सदरचा निधी उपलब्ध झाल्यास शहरात अनेक विकास कामांना चालना मिळेल व शहराचा चेहरा मोहरा बदल्यासाठी मदत होईल आणि नागरिकांना समस्यांपासून दिलासा मिळेल.