जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या मुलींच्या वस्तीगृहात भगवान गौतम बुद्ध यांच्या पवित्र मूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा अत्यंत मंगलमय आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक बुद्ध वंदना, त्रिशरण पंचशील आणि मूर्तीच्या विशेष पूजनाने करण्यात आली. यावेळी संपूर्ण परिसर ‘बुद्धं शरणं गच्छामि’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. भगवान बुद्धांचे शांतता, करुणा आणि ज्ञानाचे विचार आजच्या तरुण पिढीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन यावेळी मान्यवरांनी केले.
या सोहळ्याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. विशाखा गणवीर, डॉ. पियुष वाघ, प्रशासकीय अधिकारी प्रविण कोल्हे, वस्तीगृह अधीक्षक हर्षा कोल्हे, संकेत पाटील, शिवानंद बिरादार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

केवळ मूर्ती प्रतिष्ठापना न करता, यावेळी विद्यार्थिनींसाठी विशेष ‘ध्यान सत्र’ आणि ‘शांतता संदेश’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित महंतांनी आपल्या मार्गदर्शनातून समाजात सद्विचार, मानवता आणि शांततेचे महत्त्व अधोरेखित केले. वस्तीगृहातील विद्यार्थिनींना अभ्यासासोबतच मानसिक शांतता मिळावी, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालय प्रशासन, शिक्षकवृंद आणि विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले.








