जळगाव, (प्रतिनिधी) : उन्हाळ्याचा पारा चढत असतानाच उष्णतेच्या लाटेने गावोगावी धोक्याची घंटा वाजवली आहे. ही केवळ साधी उष्णता नसून मेंदू, हृदय आणि मूत्रपिंडावर गंभीर परिणाम करणारी आपत्ती असल्याचे मत न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांनी व्यक्त केले आहे. वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची तातडीने खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी ‘महादेव हॉस्पिटल’च्या वतीने केले आहे.
लक्षणे ओळखा आणि सावध व्हा..
अति तहान लागणे, चक्कर येणे, मळमळणे आणि हात-पायांना गोळे येणे ही उष्माघाताची सुरुवातीची लक्षणे आहेत. याकडे दुर्लक्ष केल्यास रुग्ण बेशुद्ध पडू शकतो. ग्रामीण भागात शेतकाम आणि बांधकामामुळे नागरिक दीर्घकाळ उन्हाच्या संपर्कात येत असल्याने तेथे हा धोका अधिक तीव्र आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
असा करा बचाव:
पाण्याचे सेवन: तहान लागण्याची वाट न पाहता वारंवार पाणी, ताक, लिंबूपाणी किंवा ओआरएस प्यावे.
कामाच्या वेळा: दुपारच्या कडाक्याच्या उन्हात बाहेर पडणे टाळून सकाळी किंवा संध्याकाळी कामे उरकावीत.
पोशाख: सैल आणि फिकट रंगाचे सुती कपडे वापरावेत; बाहेर पडताना डोके झाकलेले असावे.
तातडीचे उपचार: रुग्ण गोंधळलेला वाटल्यास किंवा शुद्ध हरपल्यास त्याला तात्काळ थंड जागी हलवून अंगावर थंड पाणी टाकावे व त्वरित डॉक्टरांकडे न्यावे.
उष्णतेवर मात करण्यासाठी गावपातळीवर पिण्याच्या पाण्याची सोय आणि ओआरएसचा साठा उपलब्ध असणे गरजेचे आहे. तसेच, वाढत्या तापमानावर कायमस्वरूपी उपाय म्हणून स्थानिक झाडे लावण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे डॉ. तायडे यांनी स्पष्ट केले. “उष्णता सहन न करता ती ओळखून खबरदारी घेतल्यास अनेक जीव वाचू शकतात,” असे आवाहन त्यांनी शेवटी केले.







