जळगाव, (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा आणि काही ठराविक अधिकारी व ठेकेदारांच्या फायद्यासाठी जळगावकर जनतेच्या कराच्या पैशांची होत असलेली उधळपट्टी अखेर थांबली आहे. उपमहापौर मनोज चौधरी यांनी गेल्या दोन महासभेत वजन काट्याबाबत वारंवार केलेल्या सुचना आणि पाठपुराव्याला अखेर यश आले असून, कचरा डेपो येथील मनपाच्या स्वतःच्या मालकीचा वजन काटा अखेर सुरू करण्यात आला आहे.
कचरा डेपोवर मनपाचा स्वतःचा वजन काटा उपलब्ध असतानाही, केवळ तीन लाख रुपयांच्या किरकोळ दुरुस्तीअभावी तो धूळ खात पडला होता. याचाच गैरफायदा घेत मनपा प्रशासनाने खाजगी वजन काट्याला लाखो रुपयांची बिले अदा केली होती. स्वतःच्या मालकीची यंत्रणा असताना केवळ काही निवडक अधिकारी आणि ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठीच जळगावकरांच्या टॅक्सच्या पैशांचा हा अपव्यय सुरू असल्याबद्दल उपमहापौर मनोज चौधरी यांनी महासभेत तीव्र खंत आणि संताप व्यक्त केला होता.
अखेर उपमहापौरांच्या दबावानंतर प्रशासनाला जाग आली असून कचरा डेपोवरील वजन काटा सुरू करण्यात आला आहे. आता या वजन काट्यावर पारदर्शकता आणण्यासाठी सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, या सीसीटीव्हीचा थेट ॲक्सिस उपमहापौर मनोज चौधरी यांच्या दालनातील स्क्रीनवर लाईव्ह दिसणार आहे. यामुळे कचऱ्याच्या वजनात होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील घोळ आणि आर्थिक गैरव्यवहाराला पूर्णपणे आळा बसणार आहे.
‘टीबी हाऊस’चा काटाही लवकरच सुरू होणार..
कचरा डेपोच्या काट्यासोबतच, शहरातील ‘टीबी हाऊस’ येथे असलेला आणि सध्या धूळ खात पडलेला दुसरा वजन काटाही तात्काळ दुरुस्त करून सुरू करण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना उपमहापौर मनोज चौधरी यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे मनपाच्या महसुलाची होणारी गळती रोखण्यात आता मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे.








