जळगाव, (प्रतिनिधी) : “कौटुंबिक कलह म्हणजे केवळ वैवाहिक वाद नाहीत, तर शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी आणि गरीब शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे हे देखील सामाजिक समुपदेशनाचे मुख्य अंग आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले यांनी केले.
ओंकारनगर, जळगाव येथे २२ एप्रिल २०२६ रोजी महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाच्या खान्देश शाखा ‘कौटुंबिक कलह समुपदेशन केंद्राचा’ उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी मंचावर महासंघाचे ज्येष्ठ सल्लागार व समिती प्रमुख बंडू काळे, महिला उपाध्यक्षा नीता वराडे, कोषाध्यक्ष डॉ. मिलिंद पाटील, जळगाव जिल्हा लेवा पाटीदार मंडळाचे अध्यक्ष लीलाधर चौधरी आणि विधी सल्लागार ॲड. ज्योती भोळे, प्रा. संध्या महाजन, कमलाकर रोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे उद्घाटन कोणत्याही राजकीय नेत्याच्या हस्ते न करता, उपस्थित समाजबांधवांमधून ‘लकी ड्रॉ’ काढण्यात आला. यात विजयी ठरलेले शांताराम फेगडे यांच्याहस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. महासंघाच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण बोरोले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मिलिंद पाटील यांनी तर आभार प्रदर्शन महेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सांगता श्रीमती साधना लोखंडे यांनी सादर केलेल्या पसायदानाने झाली. या सोहळ्याला लेवा पाटीदार समाजातील पदाधिकारी, सदस्य आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.








