जळगाव, (प्रतिनिधी) : अनोळखी क्रमांकावरून वीजबिल भरण्यासंदर्भातील येणाऱ्या फसव्या संदेशाला बळी पडू नये आणि वीज ग्राहकांना लुटणाऱ्या सायबर स्कॅमरपासून सावध राहण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे. महावितरणने कंपनीच्या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या अॅपवर फेक मेसेजद्वारे होणारी फसवणूक कशी रोखता येईल याची विस्तृत माहिती दिली आहे.
तुमचे वीज बिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. याकरिता ताबडतोब सोबत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट मेसेज नागरिकांना पाठविण्यात येत आहेत. एखाद्या ग्राहकाने संपर्क साधला तर वीज बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून ऑनलाइन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठवून ग्राहकांना सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यास सांगितले जाते. त्यास प्रतिसाद दिल्यास मोबाइल किंवा संगणक हॅक करून बँक खात्यातील रक्कम लंपास होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी अशा बनावट मेसेजकडे पूर्णत: दुर्लक्ष करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
महावितरणकडून केवळ मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टमद्वारे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रीडिंग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची रीतसर नोटीस आदींची माहिती एसएमएसद्वारे पाठविण्यात येते.
तसेच अधिकृत मेसेजमधून वीजग्राहकांना किंवा नागरिकांना महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाइलवर संपर्क करण्याबाबत कळवत नाही. वीज बिलाबाबत काही शंका व तक्रारी असल्यास किंवा याबाबत काही एसएमएस आल्यास वीजग्राहकांनी 24 तास सुरु असलेल्या टोल फ्री क्रमांक किंवा नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.
सतर्क राहा : फसवणूक टाळा, अधिक माहिती / प्रश्नांसाठी, ग्राहक 1912/ 19120/ 1800-212-3435/1800-233 या अधिकृत टोल फ्री नंबरवर संपर्क करू शकतात.