जळगाव, (प्रतिनिधी) : स्थानिक तरुणांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ. केतकीताई पाटील फौंडेशन व जिल्हा कौशल्य विकास रोजगार केंद्र,जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सरदार जी जी हायस्कूल च्या सहकार्याने ११ ऑगस्ट मंगळवार रोजी रावेर येथे रोजगार मेळावा घेण्यात आला. भर पावसातही या मेळाव्यात ११५ युवकांची नोंदणी झाली असून ४५ युवकांची प्राथमिक निवड झाली आहे.

रावेर येथील सरदार जी. जी. हायस्कूलच्या जिमखाना हॉल मध्ये आयोजित भव्य रोजगार मेळाव्याचे उदघाटन आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी रावेर नगराध्यक्षा संगीता महाजन, भाजपचे जेष्ठ नेते सुरेश धनके,माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष अरुण शिंदे, सरदार जी जी हायस्कुल चेअरमन संतोष अग्रवाल, विवरे माजी सरपंच वासुदेव नरवाडे, जळगाव पूर्वच्या भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा डॉ.केतकीताई पाटील फाउंडेशन च्या संचालिका डॉ. केतकी पाटील, भाजप रावेर उत्तर मंडळाध्यक्ष रवींद्र पाटील, रोजगार कौशल्य केंद्राचे दिनेश चौधरी, डॉ संदीप पाटील, रावेर शिक्षण संस्थेचे देवेंद्र मिसर, उमेश महाजन, नगरसेवक दिलीप पाटील, राजू सुवर्णे, योगिता पाटील, सपना महाजन, अर्चना पाटील, राजेश शिंदे, अमोल पाटील, मनोज श्रावगे आदि मान्यवर उपस्थित होते.

रावेरच्या रोजगार मेळावा कार्यक्रमाचे प्रास्ताविक वासुदेव नरवाडे यांनी केले. यावेळी रोजगार मेळाव्यासाठी आलेल्या जळगाव, चोपडा, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर येथील सात नामांकित कंपन्याचे प्रतिनिधींना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती भेट देऊन सन्मानित केले.
या मेळाव्याला परिसरातील बेरोजगार तरुण-तरुणींनी भर पावसातही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

रावेर परिसर आणि ग्रामीण भागातील एकूण ११५ सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या मेळाव्यात अधिकृत नोंदणी केली. यामध्ये विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या तरुण-तरुणींचा समावेश होता. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्या. उमेदवारांचे कौशल्य आणि शैक्षणिक पात्रता लक्षात घेऊन कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात ४५ मुलांची प्राथमिक निवड केली आहे. प्राथमिक निवड झालेल्या या तरुणांना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. ग्रामीण भागातील तरुणांना स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या संधी मिळवून देणारा हा पहिला स्तुत्य उपक्रम ठरला,असे मान्यवरांनी मनोगतातून व्यक्त केले.








