जळगाव, (प्रतिनिधी) : गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंतर्गत असलेल्या ह.भ.प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयाने एक नवा इतिहास रचला आहे. नेत्रालयाच्या वतीने खान्देश, विदर्भ आणि संभाजीनगर विभागात राबविण्यात आलेल्या ‘मोतीबिंदू निर्मूलन अभियाना’ अंतर्गत सन २००८ ते २०२६ या कालावधीत तब्बल ६१ हजार २२९ यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील हजारो रुग्णांच्या जीवनात या अभियानाने नव्या प्रकाशाची पहाट आणली आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने मोफत उपचार..
या विशेष मोहीमेत ग्रामीण व दुर्गम भागातील गरजू रुग्णांची तपासणी व निवड करून त्यांच्यावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. वर्षनिहाय आकडेवारी पाहिल्यास, २००८ ते २०११ या काळात ८,२१३, तर २०१२ ते २०२६ या कालावधीत ५३,०१६ अशा एकूण ६१,२२९ शस्त्रक्रिया पार पडल्या.
सेवेची प्रेरणा आणि दूरदृष्टी..
गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे हे अभियान प्रत्येक गरजूंपर्यंत पोहोचले. “ह.भ.प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर आणि दिवंगत श्रीमती गोदावरी आजी यांच्या सेवाभावातूनच या अभियानाला प्रेरणा मिळाली आहे. भविष्यातही एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, यासाठी हे अभियान अधिक व्यापक केले जाईल,” असा संकल्प डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केला.
डॉक्टरांचे अविरत परिश्रम..
या मोहिमेच्या यशात डॉ. एन. एस. आर्विकर आणि डॉ. प्रेमचंद पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक डॉ. नि. तु. पाटील, डॉ. रेणुका पाटील यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांची मोठी टीम आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.
▪️”मनाचा निश्चय केला की सर्व काही सोपे होते. आमचे डॉक्टर पहाटे ५ वाजेपासून शस्त्रक्रियांना प्रारंभ करतात. त्यानंतर सकाळी ९ वाजता शिबिराच्या गावी पोहोचून दुपारी २ वाजेपर्यंत रुग्णांची तपासणी केली जाते. रुग्णांना दृष्टी देण्याचा हा आनंद शब्दातीत आहे.”
-डॉ. नितू पाटील (समन्वयक, मोतीबिंदू शिबिर)








