जळगाव, (प्रतिनिधी) : भुसावळ-जळगाव महामार्गावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाजवळ असलेला महावितरणचा विद्युत खांब आणि सबस्टेशनची भिंत यामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. नुकतीच एका ट्रकने येथील खांबाला धडक दिल्याने तब्बल ८ दिवस दुरुस्तीचे काम सुरू होते. या काळात परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने रुग्णालयातील अतिदक्षता विभाग, एमआरआय आणि सिटीस्कॅन यांसारख्या अत्यावश्यक सेवांना जनरेटरचा आधार घ्यावा लागला. मात्र, या समस्येचे मूळ कारण महावितरण आणि रस्ते महामंडळ यांच्यातील समन्वयाचा अभाव असल्याचे समोर आले आहे.
विद्यार्थी आणि रुग्णांचे हाल..
येथे सर्विस रोड अत्यंत अरुंद असल्याने एसटी बसेस आणि अवजड वाहने वळताना मोठी अडचण येते. अधिकृत बस थांबा असूनही, रस्ता अरुंद असल्यामुळे बसेस थांबत नाहीत. परिणामी, रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि विद्यार्थ्यांना अर्धा ते एक किलोमीटर पायपीट करावी लागते.
प्रशासकीय अनास्था..
महामार्ग पूर्ण होऊन बराच काळ लोटला असला, तरी सबस्टेशनच्या जागेचा पेच सुटलेला नाही. महावितरणने आपली जागा रस्ते महामंडळाला हस्तांतरित केल्याशिवाय रस्ता रुंद होणे शक्य नाही. याच पट्ट्यात दोन ते तीन विद्युत खांब थेट रस्त्यात येत असल्याने भविष्यात मोठ्या अपघाताची भीती वर्तवण्यात येत आहे.
”अनेकदा तक्रारी आणि निवेदने देऊनही प्रशासन ढिम्म आहे. भविष्यात एखादी मोठी जीवितहानी झाल्यावरच यंत्रणांना जाग येईल का?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक आणि महाविद्यालय प्रशासनाकडून विचारला जात आहे. संबधित विभागाने तातडीने समन्वय साधून ही जागा ताब्यात घ्यावी आणि रस्ता रुंद करावा, अशी मागणी होत आहे.







