साडेतीन लाखांचा दंड वसूल; नियम मोडणाऱ्यांचे धाबे दणाणले
जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी कारवायांना चाप लावण्यासाठी जळगाव पोलीस दलाने धडक कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी, ८ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ तासांच्या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी ‘विशेष नाकाबंदी मोहीम’ राबवण्यात आली. या मोहिमेत एकूण ३१९ बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ३ लाख ५८ हजार २५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
२३१ पोलीस अधिकारी-अंमलदारांचा ताफा रस्त्यावर..
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. यामध्ये अपर पोलीस अधीक्षक (जळगाव व चाळीसगाव परिमंडळ), सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांचा सक्रिय सहभाग होता. मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ३९ पोलीस अधिकारी आणि १९२ पोलीस अंमलदार असे एकूण २३१ जणांचे मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते.
२२५० वाहनांची तपासणी; एका वाहनावर जप्तीची कारवाई..
नाकाबंदी दरम्यान जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि मोक्याच्या ठिकाणी तब्बल २२५० संशयित वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ३१९ चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये ट्रिपल सीट प्रवास, विनापरवाना वाहन चालवणे, फॅन्सी नंबर प्लेट, मद्यपान करून वाहन चालवणे. यासह गंभीर उल्लंघन करणाऱ्या एका वाहनावर जप्तीची कारवाई देखील करण्यात आली आहे.
भुसावळ आणि जळगाव शहर वाहतूक शाखेची मोठी कारवाई..
जळगाव शहर वाहतूक शाखेने ६१ केसेसमध्ये ५४,५०० रुपये दंड वसूल केला, तर भुसावळ वाहतूक शाखेने १०३ केसेसमध्ये ६९,१०० रुपये दंड वसूल करून सर्वाधिक दंडात्मक कारवाईची नोंद केली आहे.
आगामी काळातही जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी अशा प्रकारच्या ‘सरप्राईज’ नाकाबंदी आणि तपासणी मोहिमा सातत्याने राबवल्या जातील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.







