जळगाव, (प्रतिनिधी) : परिस्थितीशी हतबल, अगतिक झालेला व्यक्ती भरकटून बुवा बाबांच्या दरबारी बसतो आणि त्याचे आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण होते. त्यामुळे अंधश्रद्धेत फसलेल्या व्यक्तीला क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची अधिक गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. डी. एस. कट्यारे यांनी केले आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जळगाव जिल्ह्याची महत्त्वाची बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. या बैठकीत आगामी काळात जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी ‘वैज्ञानिक दृष्टिकोन युक्त शाळा’ आणि ‘लर्निंग फेलोशिप’ अंतर्गत विशेष कार्यक्रम राबवण्याचा संकल्प करण्यात आला.
या बैठकीला निरीक्षक म्हणून अंनिसचे राज्य पदाधिकारी प्रा. डी. एस. कट्यारे उपस्थित होते. त्यांनी अहिल्यानगर येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीचा सविस्तर वृत्तांत मांडला. मंचावर राज्य पदाधिकारी विश्वजीत चौधरी, जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हाद बोऱ्हाडे, जिल्हा प्रधान सचिव रवींद्र चौधरी, सुनील वाघमोडे आणि शहर अध्यक्ष प्रा. डॉ. युवराज वाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत जळगाव जिल्ह्यातील विविध शाखांनी आपला प्रगती अहवाल मांडून मागील चार महिन्यांत केलेल्या समाजप्रबोधनाच्या कामांची माहिती दिली. अहिल्यानगर येथील राज्य बैठकीत जळगाव जिल्ह्यातील संस्था व कार्यकर्त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल या बैठकीत त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. नाशिकच्या खरात प्रकरणानंतर राज्यभरामध्ये गेल्या चार महिन्यात ७० बुवाबाबांवर कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.
उत्कृष्ट शाखा पुरस्कार: जामनेर व अमळनेर शाखा आणि लक्षवेधी कार्यकर्ता पुरस्कार जिल्हा उपाध्यक्ष नाना लामखेडे, जळगाव शहर कार्याध्यक्ष मीनाक्षी चौधरी, जामनेरचे तीर्थराज सुरवाडे आणि अमळनेरचे डॉ. दिनेश पाटील यांना मिळाला आहे. “अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम आजही समाजासाठी किती आवश्यक आहे,” यावर शहर अध्यक्ष प्रा. डॉ. युवराज वाणी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तर राज्य पदाधिकारी प्रा. दिगंबर कट्यारे यांनी ‘वैज्ञानिक दृष्टिकोन युक्त शाळा’ आणि ‘लर्निंग फेलोशिप’ या उपक्रमांची रूपरेषा स्पष्ट केली.
येत्या काळात जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा- महाविद्यालयांपर्यंत पोहोचून विद्यार्थ्यांमध्ये विवेकवाद रुजवला जाईल, अशी माहिती प्रधान सचिव रविंद्र चौधरी यांनी दिली. या बैठकीच्या यशस्वीतेसाठी शहर शाखा कार्याध्यक्ष मीनाक्षी चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.








