जळगाव, (प्रतिनिधी) : येथील शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण बांधव व स्नेहीजन परिवारातर्फे १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध (मुंज) सोहळा नुकताच अत्यंत मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात एकूण १२ बटूंनी उपनयन संस्काराचा लाभ घेतला. बटूंच्या मौंजीबंधनाचे विधी शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण करण्यात आले.
सदर व्रतबंध सोहळ्याचे पौरोहित्य वे.शा.सं. गजानन लपाळीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. याप्रसंगी उपस्थित बटूंना वेदशास्त्र संपन्न देवेंद्र गडीकर यांनी आशीर्वाद दिले आणि ब्रह्मचर्य आश्रमातील शिस्तीचे व संस्कारांचे महत्त्व पटवून देत मोलाचे मार्गदर्शन केले.

या उपक्रमाचे आयोजन परिवाराचे प्रकाश मुरलीधर अत्रे व चंद्रकांत अत्रे यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल व प्रशांत जोशी, जितेंद्र अत्रे यांच्यासह अनेक दानशूर व्यक्तींचे बहुमोल सहकार्य लाभले. या सोहळ्याला जळगाव शहर व परिसरातील शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामूहिक उपक्रमामुळे समाजातील एकोपा वृद्धिंगत होत असल्याची भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.







