जळगाव, (प्रतिनिधी) : अपघातात मृत्यू झाल्याचा खोटा बनाव रचून मित्राचाच खून करणाऱ्या तीन आरोपींना यावल पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे शोधून काढून अटक केली आहे. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे अवघ्या काही दिवसांतच या गुन्ह्याचा पर्दाफाश केला. पवन रवींद्र सोळंके (वय २६, रा. कोळन्हावी, ता. यावल) असे मृत युवकाचे नाव असून, या प्रकरणी त्याच्याच तीन मित्रांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ जून २०२६ रोजी पहाटे २:०० वाजता उमेश दिलीप परदेशी (रा. कोळन्हावी) याने यावल ग्रामीण रुग्णालयात पवन सोळंके याला मृत अवस्थेत आणले होते. त्याने पोलिसांना सांगितले की, १७ जून रोजी रात्री १२:०० वाजेच्या सुमारास तो, पवन आणि इतर दोन मित्र किनगाव येथील राज हॉटेलमध्ये जेवण करून डांभुर्णी येथे परत येत होते. डांभुर्णी शिवारात पाटाजवळ पवन लघवीसाठी थांबला असता, मागून आलेल्या एका अज्ञात ट्रकने त्याला जोरात धडक दिली, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात सुरुवातीला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यावल पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रंगनाथ धारबळे व त्यांच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला, तेव्हा पोलिसांना तिथे अपघाताचे कोणतेही चिन्ह किंवा रक्ताचे डाग आढळले नाहीत. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. डांभुर्णी गावाच्या शिवारात किनगाव-डांभुर्णी रस्त्यापासून सुमारे २०० मीटर अंतरावर असलेल्या हातनूर कॅनॉलच्या सिमेंट काँक्रीटवर काही संशयास्पद रक्ताचे थारोळे व डाग आढळून आले, जे मातीने झाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

संशय आल्याने पोलिसांनी फिर्यादी उमेश परदेशी आणि त्याच्या मित्रांना पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेतले. तेव्हा त्यांनी दुसरा बनाव रचला. “आम्ही दारू प्यायल्यानंतर कॅनॉलजवळ गप्पा मारत बसलो होतो. तिथे पवनला झोप लागली आणि झोपेतच तो २५ फूट खोल कॅनॉलमध्ये पडल्याने त्याचा मृत्यू झाला. गावातील लोक आपल्यावर संशय घेतील म्हणून आम्ही अपघाताची खोटी तक्रार दिली,” अशी कबुली त्यांनी दिली.

परंतु, फॉरेन्सिक व्हॅनच्या साहाय्याने गोळा केलेले रक्त आणि मृतदेहावरील जखमांचे स्वरूप पाहता, पवनचा मृत्यू २५ फूट उंचीवरून पडल्यामुळे झालेला नसून, त्याला जबर मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी परिसरातून गोपनीय माहिती मिळवली आणि तांत्रिक विश्लेषण केले. अखेर पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
१७ जूनच्या रात्री आरोपींनी पवन सोळंके याला भरपूर दारू पाजली. त्यानंतर त्याला मोटारसायकलवरून कॅनॉलच्या ठिकाणी नेण्यात आले. तिथे जुन्या वादातून पवनच्या डोक्यात दगडाने मारून त्याचा निर्घृण खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी घटनास्थळावरून त्याची चप्पल उचलून फेकून दिली आणि रक्ताच्या थारोळ्यावर माती टाकली.
या गुन्ह्याचा पर्दाफाश केल्यानंतर यावल पोलिसांनी १) उमेश दिलीप परदेशी (वय ३१ वर्षे, व्यवसाय- मजुरी, रा. कोळन्हावी), २) चेतन मोतीराम कोळी (वय ३२ वर्षे, व्यवसाय- भाजीपाला विक्री, रा. डांभुर्णी, ह.मु. शिक्रापूर, पुणे) आणि ३) लोकेश दिवाकर महाजन (वय ३२ वर्षे, रा. डांभुर्णी, ता. यावल) या तिघांना अटक केली आहे. या प्रकरणी आता खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
ही धडक कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पो.स्टे.चे प्रभारी अधिकारी पो.नि. रंगनाथ धारबळे, सपोनि अजयकुमार वाढवे, पोउपनि अनिल महाजन, पोहेकॉ वासुदेव मराठे, पोहेकॉ संदीप सूर्यवंशी, पोना किशोर परदेशी, पोकॉ सचिन पाटील, योगेश खांडे, ऐजाज गवळी, हितेश बागुल, सागर कोळी आणि अल्लाउद्दीन तडवी यांच्या उत्कृष्ट पथकाने केली आहे.







