जळगाव, (प्रतिनिधी) : चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते संस्कारांचे एक प्रभावी माध्यम आहे. अशा महोत्सवांमुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो आणि त्यांना आपल्या गौरवशाली इतिहासाची ओळख होते, असे प्रतिपादन रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी केले. अजिंठा फिल्म सोसायटी, बालरंगभूमी परिषद आणि पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाचे उद्घाटन गुंजाळ यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘रणपती शिवराय स्वारी आग्रा’ या ऐतिहासिक चित्रपटाचे सादरीकरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी आग्र्याच्या कैदेतून केलेली सुटका हा रोमहर्षक इतिहास पडद्यावर अनुभवताना उपस्थित शेकडो विद्यार्थी भारावून गेले होते. “जय भवानी, जय शिवाजी” च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. केवळ मनोरंजनच नव्हे, तर नव्या पिढीला स्वराज्याचा इतिहास समजावा या उद्देशाने आयोजकांनी या चित्रपटाची निवड केली होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. संजय हांडे, सचिन महाजन आणि डॉ. वीणा महाजन यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक गुंजाळ यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर विनीत जोशी, डॉ. श्रद्धा पाटील शुक्ल, डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, डॉ. सुचित्रा लोंढे, किरण सोहळे, रत्नाकर पाटील, योगेश शुक्ल, विनोद ढगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनंत पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन शैलेश शिरसाठ यांनी आणि आभार प्रदर्शन श्वेता जैन यांनी केले.
महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी चित्रसाधना, पालकशाळा आणि बालरंगभूमी परिषदेच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाचे पालक आणि शिक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.







