जळगाव, (प्रतिनिधी) : भुसावळ येथील एका २३ वर्षीय तरुणाच्या डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीवर जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तज्ज्ञांनी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. वेळेवर मिळालेल्या उपचारामुळे या तरुणाला नवजीवन मिळाले असून त्याची प्रकृती आता वेगाने सुधारत आहे.
भुसावळ येथील रहिवासी सुमित गजानन पवार (वय २३) हा तरुण कामावर जात असताना त्याच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात सुमितच्या डोक्याला जबर मार लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाला होता. परिणामी त्याच्या शरीराची हालचाल मंदावली होती आणि हात-पायांची ताकद कमी झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याला तातडीने जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मेंदू व मणका विकार तज्ज्ञ डॉ. विपूल राठोड आणि त्यांच्या टीमने तातडीने सुमितची तपासणी केली. सीटी स्कॅन व एमआरआय अहवालात सुमितच्या डोक्याच्या डाव्या बाजूच्या हाडाला खोलवर फ्रॅक्चर (लेफ्ट पेरिएटल डिप्रेस्ड स्कल फ्रॅक्चर) होऊन मेंदूत रक्त साचल्याचे (हिमॅटोमा) निदान झाले. वेळ न घालवता डॉ. राठोड यांनी टीमसह ‘लेफ्ट पेरिएटल क्रेनिओटोमी’ ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया करून दाबलेले हाड काढले आणि साचलेले रक्त बाहेर काढले.
ही यशस्वी शस्त्रक्रिया डॉ. विपूल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रितम दास, डॉ. श्रृती खंडागळे, भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. सतीश आणि आयसीयू विभागातील शालीक चौधरी यांच्या सहकार्याने पार पडली. शस्त्रक्रियेनंतर सुमितच्या प्रकृतीत मोठी सुधारणा दिसून येत असून त्याच्या हात-पायांची ताकद पूर्ववत होत आहे.
“डोक्याच्या दुखापतीमध्ये ‘गोल्डन अवर’ (अपघातानंतरचा पहिला तास) अत्यंत महत्त्वाचा असतो. सुमितला योग्य वेळी रुग्णालयात आणल्यामुळेच त्याचा जीव वाचवण्यात आम्हाला यश आले. अशा वेळी विलंब झाल्यास मेंदूवर कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो. नागरिकांनी दुचाकी चालवताना नेहमी हेल्मेट वापरावे.”
– डॉ. प्रितम दास, डॉ. उल्हास पाटील रुग्णालय.







