जळगाव, दि. 08 – उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथील घटनेविरोधात महाविकास आघाडीतर्फे सोमवार दि. ११ ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये जळगावच्या नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी केले. याबाबतची माहिती जळगावात झालेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या जिल्हा प्रमुखांतर्फे देण्यात आली.
पत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष तथा रावेर लोकसभा मतदारसंघाचे आ. शिरीष चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नूतन जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे, महानगराध्यक्ष शरद तायडे उपस्थित होते. यावेळी आ.शिरीष चौधरी यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांना बेपर्वापणे चारचाकी वाहनाखाली चिरडण्याची घटना घडली आहे. या घटनेत केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रासह अन्य दोषी संशयितांना उत्तर प्रदेशातील भाजपशासित सरकार वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. भाजपच्या काळात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांवरील अन्याय वाढले आहेत. नागरिक त्यांच्या कारभारावर नाराज आहेत. लखीमपूर खिरी घटनेचा निषेध म्हणून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सोमवारी बंदची हाक दिली आहे.
यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना आदी संघटना, पक्ष सहभागी होणार आहे. या बंद मधून आपत्कालीन व जीवनावश्यक सेवा सुरु राहणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक लाडवंजारी, योगेश देसले, काँग्रेसचे राज्य पदाधिकारी विनोद कोळपकर, जिल्हा सरचिटणीस जमिल शेख, जिल्हा पदाधिकारी डी.जी.पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, तालुकाध्यक्ष मनोज चौधरी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.