जळगाव, प्रतिनिधी : पाळधी ते जळगाव दरम्यानच्या नवीन बायपास रस्त्यावरील खचलेला भराव आणि सुरक्षा उपायांचा अभाव यामुळे सातत्याने होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेत जळगाव तालुका पोलिसांनी कंत्राटदार कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे. नगरसेवक अरविंद देशमुख यांनी ८ ऑगस्टपासून केलेल्या प्रदीर्घ व पुराव्यानिशी पाठपुराव्यानंतर पोलिसांनी ‘ॲग्रो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स’चे एमडी शैलेंद्र सिंघल, जीएम दत्ता व साईट अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

महामार्गावर ५ ऑगस्टपासून मंगला माळी, प्रेमराज चौधरी, योगेश महाजन आणि अनिरुद्ध डहाके यांचे अपघातात बळी गेले होते. नगरसेवक देशमुखांनी NHAI, पोलीस व जिल्हाधिकाऱ्यांकडे संयुक्त बैठक, रोड सेफ्टी ऑडिट व कंत्राटदारांवर कारवाईची मागणी लावून धरली होती. मात्र, दुर्लक्ष झाल्याने ३० ऑगस्टच्या मध्यरात्री आसोदा बायपासवर झालेल्या अपघातात शांताराम पाटील या ५८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला.

या अपघातात तवेरामधील चौघे गंभीर जखमी झाले. अपघातस्थळी कोणतेही बॅरिगेटिंग, रिफ्लेक्टर्स किंवा सूचना फलक नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी कंत्राटदार कंपनीच्या निष्काळजीपणावर थेट भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०५ नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला.

जळगावकरांच्या सुरक्षेसाठी व मृतांच्या नातेवाइकांना न्याय मिळवून देण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांना शिक्षा होईपर्यंत हा लढा सुरूच राहील, असे प्रतिपादन नगरसेवक अरविंद देशमुख यांनी केले.








