जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यात पत्रकार असल्याचे भासवून विविध शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, व्यापारी, उद्योजक तसेच इतरांना धमकावून पैसे उकळणाऱ्या तोतया व बोगस पत्रकारांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ, जळगाव जिल्हा’ यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या संदर्भात गुरुवारी (दि. १३ ऑगस्ट) जिल्हाधिकारी आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद केल्यानुसार, जळगाव जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात तथाकथित तोतया पत्रकार सक्रिय झाले आहेत. कोणत्याही मान्यताप्राप्त संघटनेचे सदस्य नसताना अथवा अधिकृत नियुक्तीपत्र व वैध ओळखपत्र नसतानाही हे लोक खोट्या ओळखपत्रांच्या आधारे पत्रकारितेचा धाक दाखवून वसुली करत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. या प्रकारांमुळे मूळ आणि प्रामाणिक पत्रकारितेची नाहक बदनामी होत असून, व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या गंभीर बाबीची दखल घेऊन अशा बोगस पत्रकारांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील अशा संशयित व्यक्तींची स्वतंत्र यादी तयार करून त्यांच्यावर प्रशासनाने कडक देखरेख ठेवावी, अशी आग्रही विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम, संस्थापक सचिव भगवान सोनार, जिल्हाध्यक्ष चेतन वाणी आदींसह पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

हे निवेदन माहिती व पुढील योग्य त्या कारवाईसाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार आणि सर्व पोलीस निरीक्षकांनाही पाठवण्यात आले आहे. प्रशासनाकडून यावर लवकरात लवकर ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा पत्रकार संघाने व्यक्त केली आहे.









