जळगाव, (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या निमित्ताने अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल (प्रायमरी) व अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल (सेकंडरी) येथे दिंडी सोहळा आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी व दिंडीत सहभागी होत प्रत्यक्ष वारीचा आनंद अनुभवला.

यावेळी विद्यार्थ्यांनी “पंढरीचा पांडुरंग विटेवर का उभा आहे?” या विषयावर आधारित विशेष नाटिका सादर केली. या नाटिकेतून वारकरी संप्रदायाचा इतिहास, संत परंपरा, भक्ती आणि विठ्ठलभक्तीचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. शाळेच्या प्राचार्या रेश्मी लाहोटी यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना पालखी, दिंडी आणि वारीचे सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व समजावून सांगण्यात आले.

महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेची ओळख करून देतानाच भक्ती, समता, सेवा आणि संस्कार यांचे महत्त्वही विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. यंदाच्या दिंडी सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरण संवर्धनाचा संदेश. दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांनी “झाडे लावा, झाडे जगवा” चा जयघोष करत हरित पर्यावरणाची जनजागृती केली. भक्तीबरोबरच पर्यावरण संरक्षणाची जबाबदारीही प्रत्येकाने स्वीकारावी, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

अनुभूती स्कूल च्या संचालिका निशा जैन, प्राचार्य रेश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर सोनवणे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. वारीची अनुभूती देणारी नाटिका वैशाली दुसाने यांनी साकारली, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयश्री कासार यांनी केले. विठ्ठलनामाच्या अखंड गजराने आणि भक्तिरसाने संपूर्ण शाळा परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.








