अमळनेर, (प्रतिनिधी) : सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून खदाणीत पडणाऱ्या मित्राला वाचवण्याच्या प्रयत्नात तीन जिवलग मित्रांचा ३० फूट खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अमळनेर येथे घडली. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास चोपडा रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळील खदाणीत घडली. मानव बंटी रतनानी (१४), कार्तिक विकी उध्वानी (१४) आणि दिनेश विजय पंजवानी (१७) अशी मृत मुलांची नावे असून, हे तिघेही अमळनेर येथील सिंधी कॉलनीचे रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, हे तिन्ही मित्र मंगळवारी सायंकाळी खदाणीच्या परिसरात गेले होते. खदाणीत पाण्यामध्ये एका बेटासारखा उंचवटा असून, हे तिघे पाण्यातून चालत त्या उंचवट्यावर चढले. तेथे सेल्फी काढत असताना अचानक एकाचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात पडू लागला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या मित्राने त्याचा हात धरला, मात्र तोही खाली ओढला जाऊ लागला. शेवटी तिसऱ्या मित्रानेही त्यांना वाचवण्यासाठी हात पुढे केला, परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही ३० फूट खोल पाण्यात बुडाले.
हा संपूर्ण प्रकार जवळच असलेल्या एका रिक्षाचालकाच्या निदर्शनास आला. त्याने तातडीने खदाणीच्या दिशेने धाव घेतली, तर दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने तत्परता दाखवत ‘११२’ क्रमांकावर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच देवळी येथील स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, नायब तहसीलदार सी. यू. पाटील, शहर तलाठी अशपाक पिंजारी आणि पोलीस कर्मचारी गणेश पाटील तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
मोठ्या प्रयत्नांनंतर देवळी येथील दीपक मोरे या युवकाने पाण्यात उडी मारून तिन्ही मुलांना बाहेर काढले. मात्र, दुर्दैवाने तोपर्यंत उशीर झाला होता आणि तिन्ही मुलांचा मृत्यू झाला होता. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले, या घटनेमुळे संपूर्ण अमळनेर परिसरावर आणि सिंधी कॉलनीवर शोककळा पसरली आहे.







