जळगाव, (प्रतिनिधी) : भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य, विद्यार्थी आणि शेतकरी भरडले जात असल्याचा आरोप करत रविवारी २४ मे रोजी जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने शास्त्री टॉवर चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी, काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष जमील शेख यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी अभिलाष तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत युवक काँग्रेसची मासिक आढावा बैठक पार पडली.
या आंदोलनात युवक काँग्रेसने मुख्यत्वे तीन मुद्दे लावून धरले. ‘नीट’ (NEET) परीक्षा घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असून, पेपर फोडणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच घोटाळ्यामुळे आत्महत्या केलेल्या चार विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहून, पुनःपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना एसटी बसमधून मोफत प्रवासाची सुविधा द्यावी, अशी मागणी जमील शेख यांनी केली.
दुसऱ्या बाजूला, दररोज छुप्या पद्धतीने होत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबद्दल आणि इंधन तुटवड्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. ऐन पेरणीच्या दिवसांत शेतकऱ्यांना खते आणि डिझेलची तीव्र टंचाई जाणवत असून, याला सरकारच जबाबदार असल्याचा ठराव बैठकीत करण्यात आला. प्रभारी अभिलाष तायडे यांनी युवकांना संघटन मजबूत करून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मैदानात उतरण्याचे आवाहन केले.
या वेळी प्रदेश सचिव किरण पाटील, आशुतोष पवार, तुषार संदानशिव, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष महेश पाटील, शहर जिल्हाध्यक्ष मुजीब पटेल, सलमान तडवी, गौरव देशमुख, रोहन सुर्यवंशी, मनोहर महाले, प्रज्वल राजपूत यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.







