जळगाव, (प्रतिनिधी) : रस्ते अपघातातील जखमींना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी आणि मौल्यवान प्राण वाचवण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दल व डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. अपघातानंतरचा पहिला तास म्हणजेच ‘गोल्डन अवर’ हा जखमींसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो, या काळात योग्य प्रथमोपचार मिळाल्यास मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करता येते, असा सूर या कार्यक्रमातून उमटला.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. केतकी पाटील सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अपर पोलीस अधीक्षक नंदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास बावचोळे, गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, रुग्णालय व्यवस्थापक आशिष भिरूड यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक उपस्थित होते.
प्रथमोपचार आणि सुरक्षित हाताळणीवर भर..
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात डॉ. सतीश पी. आणि डॉ. मोहीत पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अपघातग्रस्ताचा श्वास सुरू ठेवण्यासाठी करायच्या हालचाली (CPR), गर्दीवर नियंत्रण मिळवून रुग्णाला मोकळी हवा कशी मिळेल याची काळजी घेणे आणि रुग्णवाहिका येईपर्यंत करायच्या प्राथमिक उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. पोस्टर आणि प्रात्याक्षिकांच्या माध्यमातून जखमी व्यक्तीला सुरक्षितपणे कसे हाताळावे, याचे प्रशिक्षणही यावेळी देण्यात आले.
महत्त्वाचे हेल्पलाइन क्रमांक आणि ‘मृत्यूंजय दूत’
अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ”महाराष्ट्रात १०८ ही मोफत रुग्णवाहिका सेवा २४ तास उपलब्ध आहे. तसेच वाहतूक मदतीसाठी १०३३ या क्रमांकाचा वापर नागरिकांनी करावा.” शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘मृत्यूंजय दूत’ संकल्पनेवर त्यांनी प्रकाश टाकला. अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या नागरिकांना आता कायद्याचे संरक्षण असून, त्यांना कोणत्याही पोलीस चौकशीचा त्रास होणार नाही, याची ग्वाही त्यांनी दिली. स.पो.नि. विशाल पाटील यांनी पीएम राहत योजनेची माहिती देऊन जखमींना आर्थिक मदत कशी मिळवून देता येईल, यावर मार्गदर्शन केले.
मोफत रुग्णवाहिका सेवेची घोषणा..
डॉ. वैभव पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत, प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी महाविद्यालयातर्फे अपघातग्रस्त रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याची घोषणा केली. यामुळे महामार्गावरील अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळण्यास मदत होणार आहे.

कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांना प्रथमोपचार पेटी वाटप करण्यात आले. तसेच प्रत्यक्ष प्रात्याक्षिकांद्वारे शंकांचे निरसन करण्यात आले. डॉ. संस्कृती भिरूड, डॉ. ऋचा गौर आणि डॉ. मोहीत पाटील यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील पोलीस दलाला आणि मृत्यूंजय दूतांना प्रत्यक्ष फिल्डवर काम करताना तांत्रिक व वैद्यकीय दृष्टिकोनातून मोठी मदत होणार आहे.








