जळगाव, (प्रतिनिधी) : खान्देशात सध्या वैशाख वणव्याचा भीषण प्रकोप पाहायला मिळत असून, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांत तापमानाने ४५ अंशांचा टप्पा ओलांडला आहे. मंगळवारी भुसावळ शहरात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ४५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर जळगाव शहरात पारा ४५.५ अंशांवर पोहोचला होता.
जळगावकरांसाठी २०१७ नंतरचा हा सर्वात भीषण उन्हाळा ठरत आहे. ममुराबाद वेधशाळेच्या अंदाजानुसार, आगामी आठवडाभर उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. हवामान विभागाने वाढत्या उष्णतेमुळे १४ मे पर्यंत जिल्ह्यात ‘येलो अलर्ट’ जारी केला असून, २० मे नंतर अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे.









