जळगाव, (प्रतिनिधी) : पांढरा कावीळ (हिपॅटायटीस बी) या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या दोन वयोवृद्ध रुग्णांवर शिबिरातून मोफत मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया करून डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. इतर ठिकाणी उपचाराबाबत निराशा मिळालेल्या या रुग्णांना येथे नवजीवन मिळाले आहे.
याबाबत माहिती अशी की, दोन्ही रुग्णांना पांढर्या कावीळमुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाली होती. त्याचबरोबर डोळ्यांत मोतीबिंदू आल्यामुळे त्यांची दृष्टी धुसर झाली होती. अशा स्थितीत शस्त्रक्रिया करणे हे अत्यंत जोखमीचे मानले जाते. त्यामुळे अनेक ठिकाणी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला होता. मात्र डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील अनुभवी नेत्रतज्ज्ञ डॉ. नितु पाटील यांनी शिबिरात रुग्णांची सखोल तपासणी करून त्यांची वैद्यकीय स्थिती काळजीपूर्वक अभ्यासली. आवश्यक ती पूर्वतयारी, विशेष खबरदारी आणि योग्य नियोजन करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत दोन्ही रुग्णांवर यशस्वीरीत्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पार पाडली.शस्त्रक्रियेनंतर दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या दृष्टीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. उपचारानंतर रुग्णांनी समाधान व्यक्त करत डॉक्टरांचे आभार मानले. डॉ उर्मी गायकवाड, डॉ. गौरव पाटील, डॉ. प्रिया गोरे, डॉ. अभिजित, प्रतिक्षा सिस्टर शस्त्रक्रियेसाठी यांचे सहकार्य लाभले.
▪️पांढर्या कावीळ असलेल्या रुग्णांवर कोणतीही शस्त्रक्रिया करणे हे आव्हानात्मक असते. मात्र योग्य तपासणी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि अत्याधुनिक सुविधा यांच्या मदतीने अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीतही यश मिळवता येते. रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळणे महत्त्वाचे आहे, असे मत संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले.
– नितु पाटील, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.








