जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि स्ट्रीट लाईटच्या समस्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता, उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी आज आपल्या दालनात एक महत्त्वाची संयुक्त बैठक पार पाडली. या बैठकीला विद्युत विभाग आणि नगरपालिकेच्या विद्युत विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून शहरात ‘लाईट ये-जा’ करण्याचे प्रमाण वाढले असून अनेक भागांत पथदिवे बंद असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर उपमहापौरांनी अधिकाऱ्यांचा कडक शब्दांत आढावा घेतला. विशेषतः, नगरपालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे विद्युत खांब उभारण्याच्या प्रकारावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अशा कामांमुळे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटणे, रस्ते खराब होणे आणि नागरिकांच्या खासगी मालमत्तेचे नुकसान होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
उपमहापौरांनी दिलेले कडक निर्देश:
पूर्वपरवानगी अनिवार्य: कोणतेही नवीन विद्युत काम सुरू करण्यापूर्वी नगरपालिकेची लेखी परवानगी घेणे आता बंधनकारक असेल.
अखंडित वीज पुरवठा: तांत्रिक बिघाड दुरुस्त करून शहराचा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात.
तक्रार निवारण: नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता त्यांचे त्वरित निवारण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
कामात दिरंगाई किंवा निष्काळजीपणा करणाऱ्या विभागांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही उपमहापौर मनोज चौधरी यांनी यावेळी दिला आहे.







