जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित ‘जळगाव क्रिकेट लिग-२०२६’ (JCL T-20) स्पर्धा आता निर्णायक टप्प्यात आली आहे. बुधवारी झालेल्या चुरशीच्या लढतींमध्ये अमळनेर सुहांस जायंट्स आणि रावेर रॉयल्स या संघांनी बाजी मारली, तर तत्पूर्वी झालेल्या सामन्यात चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजरने पाचोरा योद्धाजवर दणदणीत विजय मिळवला.
अमळनेरचा ६३ धावांनी मोठा विजय
अमळनेर सुहांस जायंट्स आणि चाळीसगाव चॅलेंजर्स यांच्यातील सामन्यात अमळनेरने प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकांत ८ बाद १४७ धावा केल्या. यात मानव टिबरेवाल (३९), अजय पाटील (३४) आणि सतीश चतुर्वेदी (२०) यांनी मोलाचे योगदान दिले. चाळीसगावच्या ओम मुंडेने १३ धावांत ३ बळी टिपले. मात्र, १४८ धावांचा पाठलाग करताना चाळीसगावचा डाव अवघ्या ८४ धावांत आटोपला. अमळनेरच्या मोहम्मद सैफने भेदक मारा करत ३ फलंदाज बाद केले, त्याला ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले.
रावेर रॉयल्सचा थरारक विजय
दुसऱ्या एका सामन्यात रावेर रॉयल्सने पाचोरा एसकेटी योद्धाजवर ७ धावांनी निसटता विजय मिळवला. रावेरने प्रथम फलंदाजी करत १३० धावा केल्या. यात यश नहार (३१) आणि मोहम्मद नमीन (२७) यांची फटकेबाजी महत्त्वपूर्ण ठरली. आव्हानाचा पाठलाग करताना पाचोरा संघाचा डाव १२३ धावांवर मर्यादित राहिला. रावेरच्या यश नहारने ३१ धावा आणि ३ बळी घेत अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ‘सामनावीर’ किताब पटकावला.
चाळीसगाव चॅलेंजर्सचे वर्चस्व
२१ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजरने पाचोरा एसकेटी योद्धाजवर ६ गडी राखून विजय मिळवला. पाचोरा संघाने दिलेले १०६ धावांचे लक्ष्य चाळीसगावने प्रशांत डोळे (३७) आणि साहिल गायकर (२९) यांच्या खेळीमुळे १३.५ षटकांतच पूर्ण केले. अभी पाटीलने ३ बळी घेत पाचोराच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले होते.
क्वालीफायरचा फैसला उद्या!
साखळी फेरीचे आता केवळ दोन सामने शिल्लक असून २३ एप्रिल रोजी ‘क्वालीफायर’ संघांचे चित्र स्पष्ट होईल. सध्या गुणतालिकेत जामनेर सातपुडा हिरोज आणि जळगाव कोगटा किंग प्रत्येकी ६ गुणांसह अव्वल स्थानी आहेत.







