अल्पवयीन मुला-मुलींच्या विवाहाची माहिती असल्यास ‘१०९८’ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन
जळगाव, (प्रतिनिधी) : बालविवाह ही समाजाला लागलेली एक अनिष्ट प्रथा असून, तिला मुळापासून उपटून टाकण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासन आता पूर्णपणे सतर्क झाले आहे. विशेषतः आगामी अक्षयतृतीया आणि लग्नाचे शुभ मुहूर्त लक्षात घेता, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने जिल्ह्यात कडक देखरेख ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करून बालविवाह लावणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
कायद्याचा बडगा: सेवा पुरवठादारही होणार सहआरोपी..
बालविवाह प्रतिबंध अधिनियम, २००६ नुसार मुलीचे वय १८ आणि मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. केवळ पालकांवरच नाही, तर या विवाहात सहभागी होणाऱ्या प्रत्येकावर कायद्याची टांगती तलवार असेल. यामध्ये विवाह लावणारे भटजी किंवा मौलवी, मंगल कार्यालय, हॉल किंवा लॉनचे मालक आणि व्यवस्थापक, बँड, डीजे, आचारी, फोटोग्राफर आणि टेंट पुरवठादार
या सर्वांना सहआरोपी म्हणून मानले जाईल आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
जळगाव जिल्ह्याची आतापर्यंतची कामगिरी..
प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार, जळगाव जिल्ह्यात सन २०२५ मध्ये ‘चाईल्ड हेल्पलाईन १०९८’ च्या मदतीने तब्बल ६७ बालविवाह रोखण्यात यश आले आहे. तसेच जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत २७ तक्रारी प्राप्त झाल्या असून, सर्व प्रकरणांत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. एका प्रकरणात गंभीर दखल घेत गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.
गावोगावी ‘वॉच’; समितीकडे तपासणीचे अधिकार..
बालविवाहांना आळा घालण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक आणि शहरी भागात एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांना ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून नियुक्त केले आहे. ग्राम बाल संरक्षण समितीमध्ये (VCPC) सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका आणि मुख्याध्यापक यांचा समावेश असून, त्यांना विवाहात वयाची पडताळणी करण्याचे विशेष अधिकार देण्यात आले आहेत.
आरोग्यावर होणारे विपरित परिणाम..
कमी वयात विवाह झाल्यास मुलीची शारीरिक वाढ अपूर्ण राहते. लवकर गर्भधारणेमुळे मातामृत्यूचा धोका वाढतो आणि अपंग बालक जन्मास येण्याची शक्यता असते. या सामाजिक आणि आरोग्यविषयक समस्या रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. परिसरात कुठेही बालविवाहाचे नियोजन होत असल्यास तात्काळ १०९८ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.








