शिवाजीनगर परिसरातील नागरिक त्रस्त; वारंवार तक्रारी करूनही अधिकारी सुस्त
जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील शिवाजीनगर परिसरातील विविध वसाहतींमध्ये पथदिव्यांचा खेळखंडोबा सुरू असून, दिवसा दिवे सुरू राहिल्याने विजेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. तर दुसरीकडे अनेक भागात रात्री पथदिवे बंद राहत असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. या प्रकाराबाबत अल्पसंख्यांक सेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जहांगीर अहमद खान यांनी महापौर दीपमाला काळे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
शिवाजीनगर अंतर्गत येणाऱ्या दत्त कॉलनी, उमर कॉलनी, टीचर कॉलनी, रेल्वे पूल आणि चिसतीया कॉलनी या भागात गेल्या अनेक दिवसांपासून पथदिवे २४ तास सुरू आहेत. यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असतानाच, दुसरीकडे काही भागांत रात्री पथदिवे बंद असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि कामचुकारपणा..
या संदर्भात विद्युत विभागाचे अधिकारी यांच्याकडे दहा दिवसांपूर्वीच तक्रार करण्यात आली होती. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे, शिवाजीनगर विभागाचे संबंधित विद्युत अधिकारी गेल्या दहा दिवसांपासून नागरिकांचे फोन उचलत नसल्याने त्यांच्या कामचुकारपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
“विद्युत विभागाच्या गलथान कारभारामुळे विजेची मोठी नासाडी होत आहे. वारंवार तक्रार करूनही अधिकारी दखल घेत नसतील, तर हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे. प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.”
– जहांगीर अहमद खान (प्रदेशाध्यक्ष, अल्पसंख्यांक सेवा संघटना)








