जळगाव, (प्रतिनिधी) : येथील शनिपेठ पोलिसांनी सतर्कता दाखवत शहरातील दोन वेगवेगळ्या भागांत होणारे बालविवाह यशस्वीपणे रोखले आहेत. पोलिसांनी २२ जून २०२६ रोजी जमुना नगर भागात आणि १० जुलै २०२६ रोजी कांचन नगर भागातील बिंदुबाई हॉल येथे होणारे बालविवाह वेळेत थांबवून मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईनंतर पोलिसांनी बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथेला समूळ नष्ट करण्यासाठी कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला असून, भविष्यात असे कृत्य करणाऱ्यांना थेट जेलचा कडक इशारा दिला आहे.
शनिपेठ पोलीस स्टेशनच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, यापुढे कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना किंवा समुपदेशन न करता थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. कायद्यानुसार विवाहासाठी मुलीचे वय १८ वर्षे आणि मुलाचे वय २१ वर्षे असणे बंधनकारक आहे. याचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ अंतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाईल.


विशेष म्हणजे, यामध्ये केवळ माता-पिताच नव्हे, तर विवाहाला संमती देणारे नातेवाईक, विवाह लावणारे पुरोहित किंवा काझी, मंडप डेकोरेटर्स, बँडवाले, वाजंत्री आणि फोटोग्राफर या सर्वांना सहआरोपी करून थेट जेलमध्ये पाठवले जाईल. हा गुन्हा सिद्ध झाल्यास दोषींना २ वर्षांपर्यंत सक्तमजुरी आणि १ लाख रुपये दंडाची कठोर शिक्षा होऊ शकते, तसेच संबंधित व्यावसायिकांचे व्यवसाय परवाने कायमचे रद्द केले जातील.
हा केवळ संदेश नसून भविष्यातील कडक कायदेशीर चेतावणी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांचे पथक अशा गुन्ह्यांवर २४ तास लक्ष ठेवून असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. सदरची कौतुकास्पद कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल, पोउनि प्रिया दातीर, परि. पोउनि संतोष खेडकर, परि. पोउनि अभिषेक कटारे यांच्यासह श्रीराम बोरसे, योगेश जाधव, विजय खैरे, अजय निकम, अनिल साळुंखे, अमोल वंजारी, पराग दुसाने, निलेश घुगे, नवजित चौधरी, संभाजी पाटील आणि गणेश ढाकणे आदींच्या पथकाने केली आहे.








