जळगाव, (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जळगावात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या गौरवशाली कार्याचे स्मरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष नरेंद्र कदम, केंद्रीय सचिव भगवान सोनार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर उत्साही झाला होता.
याप्रसंगी डॉ. बाबासाहेबांच्या पत्रकारितेतील योगदानावर विशेष प्रकाश टाकण्यात आला. जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विश्वजीत चौधरी यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पत्रकारिता” या विषयावर सविस्तर माहिती दिली. “बाबासाहेबांनी मूकनायक, बहिष्कृत भारत यांसारख्या पत्रांच्या माध्यमातून शोषित आणि वंचितांचा आवाज बुलंद केला. त्यांचा पत्रकारितेचा आदर्श आजही सर्व पत्रकारांसाठी प्रेरणादायी आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष चेतन वाणी, जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत पाटील, शहराध्यक्ष जितेंद्र कोतवाल, लालचंद अहिरे, किशोर शिंपी, योगेश सुने, विकास चव्हाण, वसीम खान आदींचा समावेश होता.पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संकल्प करत या कार्यक्रमाची सांगता झाली.







