जळगाव, (प्रतिनिधी) : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘लखपती दीदी’ उपक्रमात जळगाव जिल्ह्याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील दोन लाखांहून अधिक महिलांनी वार्षिक किमान एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत ‘लखपती दीदी’ होण्याचा बहुमान मिळवला आहे. ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे, या उद्देशाने राबविलेल्या या योजनेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, वित्तीय वर्ष २०२४-२५ मध्ये १ लाख महिलांना लखपती दीदी बनविण्याचे उद्दिष्ट होते, मात्र प्रत्यक्षात १ लाख ६ हजार ७८ महिलांनी हे यश संपादन करून उद्दिष्ट ओलांडले आहे. यासाठी सुमारे ५०० कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले होते. त्यानंतर २०२५-२६ या वर्षासाठी १ लाख ११ हजार महिलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, ते देखील पूर्णत्वास नेण्यात आले आहे. या वर्षासाठी ७५० कोटी रुपयांची कर्ज रक्कम मंजूर करण्यात आली असून, लाभार्थ्यांच्या खात्यात निधी वर्ग करण्याची प्रक्रिया सध्या प्रगतिपथावर आहे.
या उपक्रमांतर्गत महिला केवळ पारंपरिक उत्पादनांपुरत्या मर्यादित न राहता, अभिनव व मूल्यवर्धित वस्तूंची निर्मिती करत आहेत. या उत्पादनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी मिळत असल्याने महिलांना घरबसल्या शाश्वत रोजगार उपलब्ध झाला आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी सांगितले की, स्वयं सहायता गटांना कमी व्याजदरात कर्ज व आवश्यक प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामीण भागात स्वयंरोजगाराचे जाळे विस्तारले असून महिलांचे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण वेगाने होत आहे.







