जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शनिवारी उपमहापौर मनोज चौधरी यांनी आपल्या दालनात सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शाळांची सद्यस्थिती, पटसंख्या वाढवणे आणि शैक्षणिक दर्जा सुधारण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढवता येईल, यावर उपमहापौरांनी विशेष मार्गदर्शन केले. पालकांचा विश्वास संपादन करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना महापालिका शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांना खाजगी शाळांच्या तोडीचे आणि दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या.
केवळ अभ्यासातच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही जळगाव शहराचे नाव उज्ज्वल व्हावे, यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन आणि सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. शाळांच्या इमारतींची दुरुस्ती, स्वच्छता आणि अद्ययावत शैक्षणिक साधनांचा वापर करून शाळांचा चेहरामोहरा बदलण्याचा मानस उपमहापौर मनोज चौधरी यांनी व्यक्त केला.
“आपल्या महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी उद्याचे भविष्य आहेत. या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण आणि खेळाच्या संधी मिळाल्यास ते शहराचे नाव नक्कीच उंचावतील. शाळांची पटसंख्या वाढवणे आणि शैक्षणिक दर्जा सुधारणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे उपमहापौर चौधरी यांनी सांगितले. या बैठकीला जळगाव महानगरपालिकेच्या विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी, शाळांच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन उपमहापौरांनी दिले







