जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील निमखेडी येथे गुरुवारी दुपारी एक थरारक उडवणारी घटना घडली असून, कौटुंबिक वादाचे पर्यावसान हत्येत झाले आहे. एका पतीने आपल्या पत्नीची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, तीन लहान मुले पोरकी झाली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, निमखेडी परिसरात राहणारे नितीन सोनवणे (३५) आणि त्यांची पत्नी दीपाली सोनवणे (२८) हे दोघेही मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. गुरुवारी १९ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घरात कोणीही नसताना पती-पत्नीमध्ये कोणत्यातरी कारणावरून तीव्र वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात नितीनने दीपालीच्या पोटावर विळ्याने आणि डोक्यावर इतर धारदार शस्त्राने सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, दीपाली यांचा जागीच मृत्यू झाला.
पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती नितीन सोनवणे हा स्वतःहून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने कृत्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे दीपाली आणि नितीन यांची दोन मुले आणि एक मुलगी अशा तीन लहान मुलांच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपले आहे, तर वडील तुरुंगात गेले आहेत. त्यांच्या पश्चात घरात आता केवळ ही तीन मुले आणि एक वृद्ध सासू असा परिवार उरला आहे. दरम्यान, हा कौटुंबिक वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.







