जळगाव, (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील समाजमन हेलावले आहे. सरपंच व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने कायदा करून ठोस उपाययोजना कराव्यात यासाठी राज्यातील ग्रामपंचायती एक दिवसीय काम बंद आंदोलन करणार आहेत,असे पंचायत राज मंच संचालित अखिल भारतीय सरपंच परिषदेने जाहीर केले आहे.
अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने स्व.संतोष देशमुख यांना राज्यातील प्रत्येक गावात ग्रामपंचायतीमध्ये श्रद्धांजली वाहण्यात येऊन येत्या गुरुवारी ९ जानेवारी रोजी एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्याचे संघटनेच्या वतीने संस्थापक प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी कळविले आहे.
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना इमेलद्वारा मागण्यांचे निवेदन देऊन कळवले आहे. राज्यातील सर्वच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या भावना अत्यंत तीव्र असून लोकप्रतिनिधी म्हणून आणि ग्रामीण महाराष्ट्रातील गाव खेड्यातील सामाजिक वातावरण चांगले राहण्यासाठी सरपंच व सर्वच गावकारभारी सहकाऱ्यांना संरक्षण असणं अत्यंत गरजेचे आहे. सरपंच, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कायदेशीर संरक्षण अत्यावश्यक असल्याची संघटनेची प्रमुख मागणी आहे.
सरपंच परिषदेच्या मागण्या..
सरपंच व ग्रामपंचायत कर्मचारी संरक्षण कायदा असावा, प्रत्येक ग्रामसभेला पोलीस संरक्षण देण्यात यावे, स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीच व्हावी, कुटुंबियातील एकाला शासकीय नोकरी द्यावी, स्व.संतोष देशमुख यांचे स्मारक करावे, सरपंचांना विमा संरक्षण व पेन्शन लागू व्हावे.
राज्य पदाधिकाऱ्यांचे आवाहन..
शासनाचे या प्रमुख मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या ९ जानेवारी (गुरुवारी) एक दिवसीय कामबंद आंदोलनात राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावे,असे आवाहन सरपंच परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.








