जळगाव, दि.14 – ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविल्याचा आरोप करत आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे दि.15 सप्टेंबर बुधवार रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकिलच दिला नाही, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उत्तर द्यावे, अशी मागणीही जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांनी केली.
आमदार भोळे यांनी सांगितले की, गेले सहा महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा, असे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने राज्य सरकारला सातत्याने सांगितले आहे. मात्र आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यांत काही हालचालीच केल्या नाहीत. इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही दिला नाही. या हलगर्जीचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय 5 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यात झाला आहे.
सत्ताधारी पक्षातील वजनदार गटाला पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी समाजाला आरक्षण न देताच घ्यावयाच्या असल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडली नाही. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात वकिलच उभा केला नाही असे सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्षच म्हणतो आहे. विधी व न्याय खात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी व आघाडी सरकारचे पालक म्हणविणाऱ्या शरद पवार यांनी नाना पटोले यांच्या आरोपावर खुलासा करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत असे वारंवार सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टिकविण्यासाठी काहीच हालचाल केली नाही. ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे बुधवारी तालुका पातळी पर्यंत आंदोलन केले जाईल, असेही आमदार भोळे (राजूमामा) यांनी नमूद केले.
या पत्रकार परिषदेसाठी जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष नंदु महाजन, ओबीसी मोर्चा प्रदेश चिटणीस भारती सोनवणे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अॅड संजय महाजन, महानगराध्यक्ष जयेश भावसार, जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, जिल्हा पदाधिकारी महेश चौधरी, मनोज भांडारकर, गणेश माळी, प्रकाश पंडित आदी उपस्थित होते