गजानन पाटील | अमळनेर, दि. १० – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत शहरात क्रांतिदिनी हजारोंच्या संख्येत जनसमुदायाने एकत्र येऊन पर्यावरणाची शपथ घेऊन इतिहास रचला असताना दुसऱ्याच दिवशीही शहरात निघालेली भव्य तिरंगा बाईक रॅली देखील इतिहासात नोंद करणारी आणि संपूर्ण अमळनेरचे लक्ष वेधून घेणारी ठरली.
भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार स्मिता वाघ यांच्या संकल्पनेतुन आणि भारतीय जनता युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तिरंगा बाईक रॅली काढण्यात येऊन देशाला आगळ्यावेगळ्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली. प्रताप महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून या रॅलीला सुरुवात झाली, तत्पूर्वी खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष हरी भिका वाणी, सर्व संचालक मंडळ आणि माजी आ. डॉ. बी. एस. पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून देशभक्तीपर घोषणाबाजी करत रॅलीला सुरुवात झाली.
यावेळी प्रामुख्याने भाजपा प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ, खा. शि. मंडळाचे संचालक डॉ.अनिल शिंदे, निरज अग्रवाल यासह मान्यवर उपस्थित होते. रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी असलेल्या महिला भगिनींनी फेटा परिधान केला होता,,”वंदे मातरम”, “भारत माता की जय” अशा घोषणा देत ही बाईक रॅली शहराच्या दिशेने निघाली.
रॅलीवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून जल्लोषात स्वागत..
ढेकु रोडवरील शिवतीर्थ स्मारकाला माल्यार्पण केल्यानंतर पिंपळे रोड, तहसील कार्यालय, स्टेशन रोड, सुभाष चौकात सुभाष बाबूजींच्या पुतळ्यास माल्यार्पण करून राणी लक्ष्मीबाई चौकातून दगडी दरवाजा च्या आतील सुवर्ण कार समाजाच्या स्मारकास माल्यार्पण केले तेथे सराफ बांधवानी पुष्यवृष्टी केली. तर जय बजरंग व्यायाम शाळा व पानखिडकी, पवनपुत्र व्यायाम शाळा, झामी चौक गणेशोत्सव मंडळ, मेडिकल असोसिएशन आदी विविध पदाधिकाऱ्यांनी रॅलीवर पुष्पवर्षाव केला.
तसेच मंगलादेवी चौकात फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली. न्यु व्हिजन इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर दुतर्फा उभे राहून हातात तिरंगा ध्वज घेत फुलांचा वर्षाव करत रॅलीचे स्वागत केले. तिरंगा चौकात आल्यावर तिरंगा ध्वजास प्रदक्षिणा केल्यानंतर धुळे रोडवरील दुकानदार, रिक्षा युनियन, टँक्सी युनियन यांनी पुष्पवर्षाव केला. शेवटी भाजप नेते स्वर्गीय उदयबापु वाघ यांच्या बाजार समिती समोरील स्मारकावर जोरदार देशभक्तीच्या घोषणा देऊन रॅलीचा समारोप करण्यात आला.
यांचा होता रॅलीत सहभाग..
सदर तिरंगा बाईक रॅलीत खान्देश रक्षक ग्रुप, खान्देश शिक्षण मंडळ, लायन्स क्लब, रोटरी क्लब, मेडिकल असोसिएशन, विविध सामाजिक संघटना, अमळनेर महिला मंडळ, टॅक्सी युनियन, सराफ व्यावसायिक, भाजपा भाजयुमो आणि महिला मोर्चाचे सर्व शहर व ग्रामीण पदाधिकारी, व्यापारी बांधव, विविध राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते, शेतकरी बांधवांसह सामान्य नागरिक सहभागी झाले होते. रॅलीच्या आयोजनासाठी भाजयुमो पदाधिकाऱ्यांनी परीश्रम घेतले.