स्वातंत्र्यदिनीच कुसुंब्यात पाण्यासाठी महिलांचा महामार्गावर एल्गार!

१५ दिवसांनी पाणी, तेही दूषित; अजिंठा महामार्गावर रास्तारोको, ग्रामपंचायतीच्या कारभारावर संताप

जळगाव | प्रतिनिधी — स्वातंत्र्यदिनाचा उत्साह सर्वत्र सुरू असताना जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे मात्र महिलांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले. गावात गेल्या अनेक दिवसांपासून तब्बल १५ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असून, त्यातही दूषित पाणी मिळत असल्याने संतप्त महिलांनी शुक्रवारी, १५ ऑगस्ट रोजी सकाळी अजिंठा महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. महिलांच्या अचानक झालेल्या आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून काही काळ वाहतूक ठप्प झाली.


कुसुंबा ग्रामपंचायतीकडून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना पिण्याचे पाणी तसेच दैनंदिन गरजा भागविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तब्बल १५ दिवसांनी नळाला पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यातच मिळणारे पाणी दूषित असल्याचा आरोप महिलांनी केल्याने आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठ्याच्या परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने अखेर महिलांनी थेट महामार्गावर उतरून प्रशासनाचे लक्ष वेधले.
गावातील नागरिकांना किमान सहा दिवसांच्या अंतराने नियमित आणि शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्या महिलांनी केली. पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे, दूषित पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा आणि नागरिकांना पुरेसे स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
विशेष म्हणजे, स्वातंत्र्यदिनी पाण्याच्या प्रश्नावर महिलांनी आंदोलन सुरू केले असताना ग्रामपंचायत कार्यालय बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महिलांचा संताप आणखी वाढला. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असताना आपली समस्या मांडण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयातही कोणी उपलब्ध नसल्याबद्दल महिलांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, रास्तारोकोची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलांशी चर्चा करून त्यांची भूमिका जाणून घेतली. त्यानंतर महिलांनी रास्तारोको मागे घेतल्याने अजिंठा महामार्गावरील वाहतूक हळूहळू सुरळीत झाली.
दरम्यान, कुसुंब्यातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन या गंभीर प्रश्नावर कोणती भूमिका घेते, याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.








