जळगाव, (प्रतिनिधी) : पर्यावरणाचा समतोल राखणे, भावी पिढीला सुरक्षित भविष्य देणे आणि निसर्गाचे रक्षण करणे ही काळाची गरज ओळखून जळगाव येथील प्रसिद्ध ‘गोदावरी फाउंडेशन’ संचलित विविध महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांमध्ये ५ जून रोजी ‘जागतिक पर्यावरण दिन २०२६’ मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्ताने ‘एक पाऊल निसर्गाच्या दिशेने’ टाकत महाविद्यालयीन परिसरांसह ग्रामीण भागातही वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्ती आणि पर्यावरण जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग: सामूहिक शपथ व वृक्षारोपण..
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागातर्फे डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या परिसरात विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. “निसर्गापासून प्रेरित. हवामानासाठी. आपल्या भविष्यासाठी.” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. जेसिंथ धाया, विभागप्रमुख प्रा. निर्भय मोहोड, प्रा. मेनाओदेवी खुराईजम, प्रा. कॉलेट लोंढे, प्रा. आश्लेषा मून, प्रा. रितेश पडघान, प्रा. सुमित भारंबे आणि प्रा. डीवायना पवार या प्राध्यापकांसह नर्सिंगच्या ७ व्या सत्रातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. उपस्थित सर्वांनी पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेतली व परिसर हिरवागार करण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच, कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) युनिटतर्फे ‘प्लास्टिकमुक्त परिसर’ मोहीम राबवून ‘नो टू प्लास्टिक’चा ठाम निर्धार करण्यात आला.
आयुर्वेद मेडिकल कॉलेज: ‘मिशन लाईफ’ उपक्रम..
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण व ‘मिशन लाईफ’ उपक्रम उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम, जलसंधारण जनजागृती, कचरा वर्गीकरण आणि प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबवले. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे आवश्यक असल्याचा संदेश यावेळी डॉ. बोरोले यांनी दिला.
कृषी महाविद्यालयाचे ग्रामीण भागात पर्यावरण संरक्षणाचे धडे
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्य अनुभव (RAW) कार्यक्रमांतर्गत जळगाव व परिसरातील गावांमध्ये जनजागृती केली. जळगाव येथे आयोजित कार्यक्रमात सहायक गटविकास अधिकारी (वर्ग-२) दीपक प्रमिला चंद्रकांत कदम यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून ग्रामस्थांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद केले.
दुसरीकडे, मस्कावद खुर्द येथे बी.एस.सी. अॅग्रीकल्चरच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी “हरित गाव, स्वच्छ गाव, सुंदर गाव” हे ब्रीदवाक्य समोर ठेवून अनोखी मोहीम राबवली. मस्कावद ग्रामपंचायतीच्या सरपंच अलका पाटील आणि उपसरपंच प्रकाश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यक्रम अधिकारी प्रा. कार्तिक ए. खारचे यांच्या नियोजनाखाली हा उपक्रम पार पडला. अभिजित सदानशिव, हर्षद जैन, धिरज खेडकर, संकेत अघाव, अरविंद गौड आणि शेख जीशान या विद्यार्थ्यांनी केवळ वृक्षारोपणच केले नाही, तर लावलेल्या रोपांचे संवर्धन व संगोपन करण्याची लेखी जबाबदारीही स्वीकारली.
गोदावरी आय.एम.आर. मध्ये स्वच्छता मोहीम..
गोदावरी आय. एम. आर. महाविद्यालयातही जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. स्मिता चौधरी यांनी विद्यार्थ्यांना हवामान बदल, जैवविविधतेचे संरक्षण आणि जलसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. यानंतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत संपूर्ण महाविद्यालयीन परिसर श्रमदानातून प्लास्टिकमुक्त व स्वच्छ केला.
गोदावरी फाउंडेशनच्या या सर्वसमावेशक मोहिमेमुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी मोठी जागरूकता निर्माण झाली असून, सर्व स्तरातून या उपक्रमांचे कौतुक होत आहे.







