जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित ‘जळगाव क्रिकेट लीग’ (JCL) मध्ये रविवारी होणाऱ्या महाअंतिम सामन्यासाठी अमळनेर सुहास जायंट्स संघाने थाटात प्रवेश केला आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यात जळगाव कोगटा किंग्सने दिलेले २४२ धावांचे विक्रमी आव्हान अमळनेरने अवघ्या १८.३ षटकांत ३ गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या जळगाव कोगटा किंग्सने २० षटकांत ३ बाद २४२ धावांचा डोंगर उभा केला. यात ओम भोसले याने ७४ चेंडूंत १० षटकार आणि १७ चौकारांच्या मदतीने १७० धावांची ऐतिहासिक नाबाद खेळी केली. अमळनेरकडून केशव ठाकूरने २ बळी घेतले.
विशाल लक्षाचा पाठलाग करताना अमळनेरच्या फलंदाजांनी मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. मानव ट्रिबरेवाल (६४ धावा), रणजीत निकम (७६ धावा) आणि कर्णधार शुभम शर्मा (६५ धावा) यांच्या आक्रमक खेळीमुळे अमळनेरने हे लक्ष्य सहज पार केले. रणजीत निकमला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

लीगच्या अखेरच्या सामन्यात अमळनेरने पाचोरा एसकेटी योद्धाजचा ६७ धावांनी पराभव करून गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले होते. आता दुसऱ्या क्वालिफायरचा सामना आज, २५ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता जैन ड्रीम स्पेसेस मैदानावर रंगणार आहे, ज्यातून अंतिम फेरीचा दुसरा संघ निश्चित होईल.








