जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील आपत्कालीन सेवा किती ‘सावध’ आहेत, याचा प्रत्यय शुक्रवारी सकाळी उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी केलेल्या अचानक पाहणीतून समोर आला. आयुक्त बंगल्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या फायर स्टेशनची दुरवस्था पाहून उपमहापौरांनी प्रशासनाचे वाभाडे काढले. “आयुक्तांचा बंगला केवळ १० मीटरवर असतानाही त्यांना ही परिस्थिती दिसत नाही का?” असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी शुक्रवारी सकाळी आयुक्त बंगल्यालगत असलेल्या फायर स्टेशनला अचानक भेट दिली. यावेळी त्यांना तिथे अनेक धक्कादायक प्रकार पाहायला मिळाले. अग्निशमन दलासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विभागाचा लँडलाईन फोन गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याचे निदर्शनास आले. आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी संपर्क कसा साधायचा, असा गंभीर प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. या संदर्भात कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना लेखी कळवले आहे का, याचीही उपमहापौरांनी कसून चौकशी केली.
केवळ संवाद यंत्रणाच नाही, तर तांत्रिक यंत्रणाही कुचकामी ठरत असल्याचे दिसून आले. अग्निशमन दलाच्या गाड्यांमध्ये पाणी भरण्यासाठी वापरला जाणारा पंप अनेक दिवसांपासून बंद आहे. आग लागल्यास तातडीने पाणी भरण्यासाठी कसरत करावी लागत असल्याची खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. फायर स्टेशनच्या परिसरात सगळीकडे घाण साचलेली असून नियमित साफसफाई होत नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी साफसफाई होत नसल्याची तक्रार उपमहापौरांकडे केली.
या पाहणीनंतर उपमहापौर चौधरी यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. ते म्हणाले की, ”एकीकडे प्रशासन शिस्तीच्या गप्पा मारते, मात्र आयुक्तांच्या निवासस्थानापासून अवघ्या दहा मीटरवर असलेल्या फायर स्टेशनची अशी दुरवस्था होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. लँडलाईन बंद असणे आणि पंप नादुरुस्त असणे हे नागरिकांच्या जिवाशी खेळण्यासारखेच आहे.”
उपमहापौरांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना आणि संबंधित विभाग प्रमुखांना या सर्व त्रुटी त्वरित दूर करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. जर येत्या काही दिवसांत परिस्थिती सुधारली नाही, तर जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला आहे.







