आरोग्य, सुरक्षा आणि व्यसनमुक्तीचा त्रिवेणी संगम; जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा होणार ‘खान्देश रत्न’ पुरस्काराने गौरव
जळगाव, (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वप्न साकार फाउंडेशन संचलित ‘अग्निशिखा महिला ग्रुप’ तर्फे जळगाव शहरात महिलांसाठी एका विशेष आणि बहुपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २२ मार्च रोजी जिल्ह्यातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सशक्तीकरणासाठी हा अनोखा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा भारती काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि प्रबोधन..
महिलांच्या जीवनाशी निगडित महत्त्वाच्या विषयांवर या कार्यक्रमात प्रकाश टाकला जाणार आहे. यात प्रामुख्याने महिलांच्या आरोग्याशी संबंधित मासिक पाळी व इतर समस्यांवर तज्ज्ञ डॉक्टरांशी थेट संवाद साधता येईल. तसेच वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाचा वापर करताना महिलांनी कोणती काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शन तज्ज्ञांकडून दिले जाईल.
समाजातील व्यसनाधीनता दूर करण्यासाठी जाहीर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून, त्यातून जनजागृतीचा संदेश दिला जाणार आहे. जिल्ह्यात आरोग्य सेवा आणि समाजकार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, नर्सेस आणि डॉक्टरांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात येणार आहे.
‘खान्देश रत्न’ पुरस्काराची घोषणा..
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना यावेळी ‘खान्देश रत्न’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यात डॉ. निलेश चांडक, डॉ. सीमा पाटील, डॉ. पूजा सोमानी, डॉ. प्राची महाजन, डॉ. नितीन विसपुते, डॉ. अविनाश खेलवाडे, प्रा. वासुदेव पाटील, डॉ. श्रद्धा राणे, डॉ. शीतल पाटील, जागृती येवले, तृप्ती कांकरिया, युगंधरा सोळुंके, डॉ. अवधूत चौधरी आणि डॉ. रुकसाना खान यांचा समावेश आहे.
जळगाव जिल्ह्यात प्रथमच महिलांसाठी असा बहुआयामी कार्यक्रम आयोजित केला जात असून, जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अग्निशिखा महिला ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.







