अमळनेर, दि. 15 – तालुक्यातील सुमारे 52 गावांमध्ये सन 2019 च्या सप्टेंबरमध्ये मध्ये अतिवृष्टी झाली होती, त्यात निधी प्राप्त झाल्यानंतर 20 गावांना वाटप देखील केला गेला. परंतु उर्वरीत 32 गावांना अद्यापहि निधी प्राप्त झालेला नाही, किंबहुना आजही येथील बळीराजा वंचीत राहिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मारवड येथील सरपंच उमेश साळुंके शिष्टमंडळ दिलीप पाटील गोवर्धन, मधु अण्णा, ज्ञानेश्वर पवार, उमेश सुर्वे तसेच शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.
सन २०१९ (जुलै व सप्टेंबर) मध्ये झालेल्या अतिवृष्टित अमळगावसह तालुक्यातील ५२ गावातील शेती पिकांना जबर फटका बसला होता.याबाबत सातत्याने पाठपुरावा व अनेक अडचणींचा सामना करत हेक्टरी २० हजार ४०० रूपये सानुग्रह मंजूर करण्यात यश मिळाले.त्यांनतर जुलैमध्ये बाधीत २० गावांना सानुग्रह प्राप्त झाला खरा,मात्र अजूनही उर्वरित ३२ गावे (सप्टेंबरमध्ये बाधीत) वंचित आहेत.
दरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या भेटीमुळे सकारात्मक चर्चा होवून मारवड शिष्टमंडळ व शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून;तहसीलदार यांच्याकडून 20 गावांचा सानुग्रह वाटप चा अहवाल जळगावी मागवला असल्याचे सरपंच उमेश साळुंखे यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे वेळोवेळी बळीराजाला स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागते असा अनुभव या 32 गावातील वंचीत राहिलेल्या शेतकऱ्यांना आजही येतोय.