जळगाव, (प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी गावातील विद्यार्थ्यांना खराब रस्ते आणि हिंस्त्र प्राण्यांच्या धोक्यामुळे शाळेत जाण्यासाठी दररोज ५-६ किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. एसटी महामंडळाची बस सेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.
कुंड्यापाणी ते बिडगाव रस्त्यावर पावसाने मोठे खड्डे पडले आहेत, तसेच झाडेझुडपांमुळे बस चालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे बस बिडगाव येथून पुढे जात नाही, अशी माहिती बस चालकांनी दिली आहे. अनेकदा बसच्या काचा फुटल्याने नुकसान भरपाई द्यावी लागते, असेही चालकांचे म्हणणे आहे.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले कुंड्यापाणी गाव असल्याने परिसरात हिंस्त्र प्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे जीव मुठीत घेऊन विद्यार्थी पायपीट करत शाळेत जातात. वेळेवर शाळेत पोहोचू न शकल्याने शिक्षणावरही परिणाम होत असल्याचे पालकांनी सांगितले. ग्रामस्थ आणि पोलीस पाटील मुसा तडवी यांनी जिल्हा प्रशासनाकडे तातडीने कुंड्यापाणी येथे दिवसातून किमान दोन एसटी बस फेऱ्या सुरू करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होईल.