जळगाव, (प्रतिनिधी) : शांत मनाने निर्णय घेतला तर तुमचा निर्णय कधी चूकणार नाही. मन खूप चंचल आहे. त्याला शांत करण्यासाठी परमेश्वराची निस्वार्थपणे भक्ती करा, असे प्रतिपादन बीड येथील भागवताचार्य हरिहरानंद भारती स्वामी यांनी केले. येथील जय हनुमान सांस्कृतिक मंडळ आणि जुने जळगाव बहुउद्देशीय मंडळातर्फे दि. १५ ते २२ जानेवारीपर्यंत जुने जळगाव येथील बदाम गल्लीत संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दररोज रात्री ८ वाजता महाराष्ट्रातील विविध कीर्तनकार त्यांच्या सुश्राव्यवाणीतून कीर्तन करीत आहेत. रविवारी पहाटे साडेपाच वाजता काकड आरती करण्यात आली.
कथेत पाचव्या दिवशी स्वामींनी उपवास, व्रताचे महत्त्व सांगत त्यांनी बळीराजा, भगवान वामन, मस्य अवतार, श्रीराम आणि श्री कृष्णाची कथा सांगितले. भक्तासाठी ईश्वर अनेक अवतार घेत असतो. त्यामुळे परमेश्वराचे ध्यान करा. तुमच्यावर आलेल संकट तो कोणत्या ना कोणत्या रूपाने दूर करीत, असा संदेशही भागवताचार्य हरिहरानंद भारती स्वामी यांनी दिला.
यावेळी वामन अवताराचा जिवंत देखावा सादर करण्यात आला. तसेच बाळ कृष्णाचा जन्म उत्सव यावेळी साजरा करण्यात आला. सोहळ्यात पाच सुवासिनी पाळणा गायला. नंद उत्सवासाठी सभा मंडप साजरा करण्यात आला होता. कथेला हभप आर्वीकर महाराज, सोपानदेव महाराज यांनी भेट दिली. कथेनंतर राजेश खडके, विजू चौधरी, तेजस चौधरी, स्वप्नील चौधरी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
संध्याकाळी हरिपाठ घेण्यात आला. रात्री ८ वाजता हभप परमेश्वर महाराज उगले यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. यावेळी उपस्थित भाविक भक्तांनी पावली खेळून सप्ताहात उत्साह आणला. भाविकांनी दररोज कथा श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जय हनुमान सांस्कृतिक मंडळ आणि जुने जळगाव बहुउद्देशीय मंडळातर्फे करण्यात आले आहे.