गजानन पाटील | अमळनेर | प्रतिनिधी- अमळनेर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण खान्देशात यंदा वार्षिक सरासरीच्या 25% पेक्षा कमी प्रजन्यमान झाले असल्याने पिकांची आशा जवळपास संपली आहे, अश्या परिस्थितीत शेतकरी राजावर संकट आलं आहे.
दरम्यान अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जात, खान्देश दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली.
मुंबईत वर्षा या शासकीय निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अमळनेर मतदारसंघच नव्हे तर संपुर्ण खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळामुळे पीडित झालेल्या शेतकरी बांधवांच्या व्यथा मांडल्या.
बळीराजा खूपच खचलाय दुबार आणि तिबार पेरणीचे सारेच प्रयत्न फोल ठरले असून पिकांची आशा तर जवळपास संपलीच आहे, आता पुढे काय? हा एकच प्रश्न प्रत्येकासमोर असून अश्या कठीण परिस्थितीत बळीराजास हेक्टरी 25,000/- रुपये सरसकट विनाअट सानुग्रह अनुदान जाहीर करा, शेतीपंपाचे चालू वर्षाचे विज बिल माफ करा, गावोगावी गुरांसाठी चारा छावण्या सुरू करा, याव्यतिरिक्त जे जे करण्याजोगे असेल ते ते करा पण बळीराजाला धीर द्या अश्या मागण्या अत्यंत भावनाशील स्वरात आमदारांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केल्या. दरम्यान मागण्यांचे लेखी निवेदन देखील आमदार अनिल पाटील दिले. याप्रसंगी राज्याचे गृहमंत्री ना.दिलीपराव वळसे-पाटील देखील उपस्थित होते.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी त्यांचे संपुर्ण म्हणणे ऐकून घेत, महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभे राहणारे असून यात खान्देशचा विशेष प्राधान्याने विचार होईल आणि पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न होईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी आमदार पाटील यांना दिली.