जळगाव, दि.०७ – शहरातील महापालिकेच्या व्यापारी संकुलातील २३६८ गाळेधारकांचा भाडेपट्टा नूतनीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. दरम्यान आमदार सुरेश भोळे यांनी शासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्या मुळे दि.१० ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेऊन गाळेधारकांच्या भाडेपट्टा निश्चित व गाळे नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे गाळेधारक व्यापाऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याचे बोलले जातेयं.
मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळे धारकांना भाडे पट्टा नूतनीकरण नवीन दराची अंमलबजावणी सन २०१९ पासून करणार असल्याचा निर्णय शासनाने घेतला होता. परंतु आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांनी भाडेपट्टा वसुली सुधारित दर हा भाडेपट्टा करारनामा संपल्याच्या कालावधी पासून म्हणजेच सन २०१२ पासून लागू करणेसाठी मागणी केली होती. त्यास अखेर आज मंगळवारी मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे.
व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा प्रश्न आता सुटल्याने महानगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडेल व जळगाव शहराच्या विकासासाठी मदत होईल, शासन निर्णयाचे स्वागत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील, नगरविकास विभागाच्या उपसचिव श्रीमती विद्या हम्प्या यांच्या विशेष सहकार्यामुळे यश मिळाले असल्याचे आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांनी सांगितले.