जळगाव, दि.११ – स्वातंत्र्य लढ्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सांगता दि.१५ ऑगस्ट २०२२ रोजी होत आहे. देशासाठी बलिदान करणाऱ्या देशभक्तांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण अंत:करणात कायम जागते राहावे आणि आपला भारत देश सर्वांगीणदृष्ट्या सुजलाम सुफलाम राहावा ही सर्वांचीच मनोभूमिका आहे. त्यासाठीच केंद्र सरकारने ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करीत असताना १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ ही संकल्पना देशवासीयांसमोर मांडली आहे.
प्रस्तुत संकल्पनेला जैन उद्योग समूहाच्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. व जैन फार्म फ्रेश फूड्स लि. यांनी मातृभूमिच्या जाणिवेतून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जैन उद्योग समूहातर्फे ८००० सहकाऱ्यांना घरावर लावण्यासाठी राष्ट्रध्वज वितरित करण्यात येणार आहे. घरावर राष्ट्रध्वज लावण्यासाठी जैन पाईप देखील सर्व सहकाऱ्यांना देण्यात येणार आहे.
१३ ऑगस्टला कंपनीच्या सर्व आस्थापनांमध्ये ध्वजवंदनाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमानंतर सहकाऱ्यांसाठी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षिदार असलेला ठेवा लक्षात रहावा म्हणून कंपनीत ठिकठिकाणी सेल्फी पॉइंटचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात जैन इरिगेशनचा प्रत्येक सहकारी हिरीरीने सहभागी होत आहे. यामुळे ८००० सहकाऱ्यांच्या घरावर राष्ट्रध्वज मोठ्या गौरवाने फडकणार असून राष्ट्रभावना प्रज्ज्वलित राहणार आहे.